आशियाई स्पर्धेत कबड्डीचा 1990 मध्ये समावेश झाल्यापासून सलग सात सुवर्णपदके भारतीय संघाने पटकावली होती. मात्र, आठव्या सुवर्णपदकाची लढतही भारतीय संघ खेळू शकला नाही. इराणची गाठ आता कोरियाशी पडेल. त्यांनी पाकिस्तानचा 27-24 असा पराभव केला.
भारतीय संघाने इन्चॉनमध्ये गेल्या आशियाई स्पर्धेत इराणवर अवघ्या एका गुणाने विजय मिळवून सुवर्णपदक जिंकले होते. या पराभवाची इराणने आज परतफेड केली.
अखेरच्या दहा मिनिटांत सुरवातीला इराण चार गुणांनी आघाडीवर होते. भारताने ती आघाडी तीन गुणांपर्यंत कमी केली. मात्र, यापुढे त्यांना मजल मारता आली नाही. अजय ठाकूर आणि प्रदीप नरवाल हे हुकमी चढाईपटू कसे बाहेर राहतील याची काळजी इराणने अचूक घेतली आणि ऐतिहासिक विजयाची नोंद करत अंतिम फेरी गाठली.
भारतीय महिला संघाने सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठून भारताचे किमान रौप्यपदक निश्चित केले. उपांत्य फेरीच्या लढतीत त्यांची गाठ उद्या इराणशीच होणार असून, त्यांच्यावर आता पुरुषांच्या पराभवाचे दडपण राहणार आहे. उपांत्य फेरीत त्यांनी तैवानचे आव्हान 27-14 असे मोडून काढले असले, तरी तैवानच्या मुलींनी त्यांना केलेला प्रतिकार विसरता येणार नाही. महिलांनी 6-0 अशा आघाडीनंतर केलेला विस्कळीत खेळ चिंता करणारा ठरला.